Saturday, 24 December 2011

ह्यांना सुचत(सुचलं) कसं???

वाह, किती सुंदर!!
खूप छान !!


मान  गये उस्ताद !!
लई भारी !!

कधीतरी खूप छान वाचताना तर कधी छान ऐकल कि ह्या अशा प्रतिक्रिया तुम्ही बऱ्याच वेळा दिल्या असतीलच. अशी वाहवा करून पुढचा प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळेला पडला असेल (मला तो नेहमीच पडतो.)  कसं काय राव ह्यांना सुचत? आता हे "सुचण" पण काय भन्नाट कल्पना आहे ना ? पाहायला गेल तर तुम्हाला, मला बऱ्याच जणांना तस काही ना काही सुचतच असत. पण फार कमी जण असतात ज्यांना हे अगदी व्यवस्थित रित्या शब्द स्वरुपात किंवा अजून विविध ढंगाने दुसऱ्यांसमोर त्यांचे विचार मांडताही येतात.

आता उदाहरण द्यायचं झाल तर बरेच आहेत. एक दोन थोडक्यातच सांगते. पुल ची पुस्तक वाचताना(ऐकताना) अख्खी व्यक्ती जशीच्या तशी डोळ्यासमोर येतात अन तितकंच निखळ हसवून जातात. त्या उलट वपु, त्याचं साहित्य वाचताना अगदी अंतर्मुख व्हायला लावतात. पाडगावकरांच्या कवितेची तर रीतच निराळी आणि ज्या प्रकारे ते सादर करतात ते आणखीनच निराळ. सध्या गाजत असलेली संदीप खरे - सलील कुलकर्णी च्या जोडीला तर तोडच नाही. कसं काय जमत बुवा ह्यांना अगदी मोजक्याच आणि सरळ शब्दात असे खोल विचार लिहायला.

आता पाडगावकरांबद्दल लिहील म्हणून त्यांचा एक किस्सा सांगते. अशीच एकदा त्यांच्या कार्यक्रमाला गेले होते. इथेच गिरगावात साहित्याला त्यांची मुलाखत आणि त्या जोडीला त्यांचा गाजलेल्या कवितेंची, गाण्यांची मैफल. असो! तर मुलाखत घेणाऱ्याने त्यांना नेहमी प्रमाणे प्रश्न विचारायला सुरवात केली आणि नेहमी तुम्हा आम्हाला (मला) पडलेला प्रश्न विचारला पाडगावकर साहेब तुम्हाला कविता लिहिण  कसं सुचत??
त्या वर ते गमतीने म्हणाले, आता हे सुचत कसं ते मलाही नाही माहित आणि जेव्हा सुचत तेव्हा ते आपसूकच बाहेर पडत. जे छान सुचलं त्याला परत तेव्ह्ढ्याच लकबीन सुंदर करून देणंही तितकंच गरजेच असत.

मुलाखतीवरून मला अजून एका व्यक्तीच नाव आवर्जून घ्यावस वाटत ते म्हणजे सुधीर गाडगीळ. चार चौघात मुलाखत घेताना त्यांना पुढचा प्रश्न काय विचारावा हे कसं सुचत? त्यांची मुलाखत म्हणजे एक वेगळी गप्पांची मेजवानीच होवून जाते.

हे झाल चांगल ऐकण्या आणि वाचण्या बाबत पण विज्ञानाच्या बाबतीत तेच आहे की, जर न्यूटनच्या डोक्यात सफरचंद पडलच नसत, तर त्यांना गुरुत्वाकर्षणाच्या शोधाबद्दल सुचलं असत का? हे अन ते अशी एक ना अनेक उदाहरणं  आहेत. ते सगळ सांगत बसले तर बरेच लांबेल. त्यातल्या त्यात पण थोडक्यात, चित्रपट बनवताना त्या दिग्दर्शकाला कसं चित्रीकरण कराव, कसं सुचत? चित्रकाराला चित्र काढायला कसं सुचत? लेखकाला लिहिण कसं सुचत? संशोधकाला संशोधन करायचं कसं सुचत? ..... न  संपणारे असे भलते सलते प्रश्न शेवटी एकच भला मोठा प्रश्न ह्यांना कसं सुचत?

आता ह्या दिग्गज लोकांबद्दल मी अजून काय बोलणार आणि काय लिहिणार त्यात मी लिहिण म्हणजे सूर्यासमोर ठिपकाच!! हे अस काहीतरी भन्नाट सुचत म्हणून का ते असामान्य आणि आपण सामान्य. हाच का तो त्यांच्यातला आणि आपल्यातला फरक.

नेहमीच नाही पण आजूबाजूला थोडस निरखून पाहिलात कि नक्की जाणवेल. काही वेळेला जे मला सुचत नाही ते माझ्या मित्र मैत्रिणीला सुचत आणि मग ते माझ्या समोर उगीचच भाव खावून जातात.
आता हे सुचण म्हणजे आईने स्वयंपाकात रोजच्या प्रमाणे मीठ मसाला टाकण्या इतकच सोप आहे का?


शेवटी काय ज्याच त्याला सुचायच तेव्हाच सुचत. ते तुम्ही मी ठरवून नाही होत. हयात नसलेल्या दिग्गजांना बरच काही सुचलं आणि त्यांनी भरभरून दिल. जे आहेत त्यांना असच अजून भरपूर सुचू देत. जेणेकरून त्याचा आस्वाद आपण असाच घेत राहू.

खरंच,  ह्या सुचण्या मागे पण एक गंमत दडली आहे. पक्की खात्री आहे एवढ वाचून तुम्हाला पण काहीतरी सुचलंच असेल. अहो मग जरा डोक खाजवा कि राव!






आता जाता जाता मलाही हि काही सुचलय म्हणून...

"सुचण" मला पडलेलं भल मोठ कोड...
त्याची करता येत नाही फोड...
सुचलं कि वाटत फार गोड...
त्यासाठी करावी लागते विचारांची तड जोड...


 -----------
विनया ज. शिर्सेकर

Sunday, 18 December 2011

मुंबई - अलिबाग - मुंबई

खरच वाटत नाही! उद्या (१० डिसेंबर २०११) अलिबागला जायचं आहे. अगदी बोलण होत काय आणि मोजक्याच मित्र मंडळीकडून होकार मिळवून आठवड्याभरात सहलीला जायचं पक्क झालं.
ठरवल्याप्रमाणे (शेवटी भारतीय वेळेनुसारच आणि ह्या-त्या कारणांमुळे एक तास उशिराच) आम्ही सगळे सकाळी ७ च्या ठोक्याला गेट वे ऑफ इंडिया ला पोहचलो.
.साध्या बोटीच तिकीट काढून जिथून बोटी सुटतात तिथेच आजुबाजूच चित्र न्याहळत रांगेत उभे होतो. खरंच! सकाळच्या त्या कोवळ्या उन्हात आपल्या मुंबापुरीच दार (गेट वे ऑफ इंडिया) आणि हॉटेल ताज किती सुंदर दिसत होत
ठरलेल्या वेळेतच आणि सह प्रवासाच्या "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल SSS " च्या गजरात आमची बोट गेटवेच्या किनाऱ्यापासून अलिप्त झाली. पुढे सरकत असताना आणि मागे वळून पाहताना काही क्षणातच मुंबईच चित्र धूसर होत होत दिसेनास झालं.

मग वेध लागले ते मांडावा किनारा गाठायचं. त्यात समुद्राची शांतता, खिन्न होवून बसलेले (अडकलेले) मोठी जहाज आम्हाला "खूप मज्जा करा!" असं सांगत असल्याचा भास आणि त्यात बेताल (ना सूर ना ताल) होवून गाणारे आमचे सहप्रवासी ह्या सगळ्याचा रसभंग करत होते.


ती जहाज नाहीशी होताच काही वेळातच पांढऱ्याशुभ्र समुद्र पक्ष्याचा थवा आमच्या बोटी मागून गिरक्या घेऊ लागला. काही प्रवासी (त्यात मी) त्याच्या कडचा खाऊ हवेत उडवून भरवण्याचा प्रयत्न करत होती. त्या पक्ष्याची तो खाऊ चोचीत पकडण्याची झुंबड चालू होती. खाण्याचा आणि भरवण्याचा हा खेळ बराच वेळ चालू होता. खेळ संपेपर्यंत आम्ही मांडावा बंदर कडे पोहचलो आणि पक्ष्यांनी आमचा निरोप घेतला (नक्कीच दुसऱ्या प्रवासांबरोबर खेळ खेळण्यासाठी.)

मांडवा बंदरावर उतरून आम्ही डुगडुग (सहाजण बसतील एवढी मोठी रिक्षा) पकडून डागडुग करत नागावच्या किनाऱ्यावर तासाभरातच पोहचलो. पोटपूजा करून माझे मित्र मंडळी पाण्यात मज्जा लुटण्यासाठी गेले आणि मी किनाऱ्यावर त्यांचे छायचित्र काढण्यात मौज करत होते.
शनिवार सुट्टीचा वार असल्यामुळे तशी वर्दळ किनाऱ्यावर होती. नेहमीप्रमाणे त्यातले काही जण पाण्याचा, काही जण क्रिकेट खेळण्याचा, तर काही जण घोडा गाडीत फिरण्याचा आस्वाद घेत होते.

समुद्र्याचा पाण्यात मज्जा लुटून, परत  ताजतवान होवून दुपारच्या जेवणात मस्त गरमा गरम भज्जी आणि वरण भातावर ताव  मारला.

जेवण झाल्यावर शतपावली करून डुगडूगीतून परत मांडावा बंदरावर सूर्यास्त होण्या आधी पोहचलो. आता पर्यंत बरेच सूर्यास्त पहिले त्यात अजून एक, डोळे दिपून टाकणारा सूर्यास्त!



एकीकडे सूर्य अस्ताला जात होता आणि दुसरीकडे चंद्र डोक्यावर होता. प्रदूषण विरहित वातावरणात चंद्र आणि तारे इतके विलक्षण दिसत होते ( त्या दिवशी पौर्णिमा आणि चंद्र ग्रहण एकत्र असल्यामुळे चंद्र जरा जास्तच मोठा असल्याचा भासत होता) हे सगळ दृश आमच्यासाठी दुग्धशर्करा योगच होता.

हळू हळू पृथ्वी ने चंद्राला झाकोळायला सुरवात केली आणि चंद्राच्या त्या विविध कला क्षणाधार्त अनुभवल्या. ते पाहत असताना समुद्राच्या लाटांचा होणार संथ आवाज आणि निरभ्र काळोखी शांतता काही सांगत असल्याचा परत भास झाला.




असं, हे दिवसभराच आल्हाददायक आणि नयनरम्य निसर्गाच चित्र डोळ्यात साठवत आम्ही सगळेजण आपापल्या घरी परतलो......

------

विनया ज. शिर्सेकर

खिन्न झाले मी जहाजाप्रमाणे !!


Pic Courtesy : http://desktoplux.com/?lng=ru&id=367





खूप खूप लिहावसं वाटतंय
पण लेखणी आणि शब्द साथच देत नाही
म्हणून लिहावसं वाटतच नाही !!

खूप खूप रडावस वाटतंय
पण कोणी डोळे पुसणारच नाही
म्हणून रडावस वाटतच नाही !!

खूप खूप बोलावस वाटतंय
पण कोणी ऐकणारच नाही
म्हणून बोलावस वाटतच नाही !!

खूप स्वच्छंद निखळ हसावस वाटतंय
पण विनोदातही सध्या कडवटपणा जाणवतोय 
म्हणून हसावस वाटतच नाही !!

समुद्रातील जहाजांप्रमाणे खिन्न झाले
म्हणून काहीच करावसे वाटतच नाही !!

----

विनया ज. शिर्सेकर