Sunday, 15 January 2012

थोर होते ते, त्यांना इतिहास जमा करू नका!

इ. स. ३ जानेवारी, १८३१ ला सावित्रीबाई यांचा जन्मदिवस. त्या दिवसाला स्त्री मुक्तिदिन म्हणून  ओळखलं  जात. १ जानेवारी, १८४८ साली सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांनी भारतात महिलांसाठी पहिली शाळा सुरु केली.

अहो घाबरू नका, मी मूल्य शिक्षणाचा तास घेत नाही. माझ्या काही मैत्रिणी आणि इतर बरेच जण विसरभोळे झाले आहेत. त्यांना ह्या थोरांची आठवण करून द्यावीशी वाटली इतकच.






सावित्रीबाईचे आभार मानावे तितके थोडेच.त्यांच्या बद्दल लिहावास वाटल त्याला दोन कारणे आहेत.

पहिल  कारण  म्हणजे दोन वर्षापूर्वीची गोष्ट(MCA च्या दुसऱ्या वर्षी). आमच्या महाविद्यालयाच्या कार्यालयात मी आणि माझी एक वर्गमैत्रीण काही कामा निम्मत गेलो होतो. (आजही सरकारी आणि काही   निमसरकारी कार्यालयात भिंतीवरती तुम्हाला लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी आणि इतर काही थोर मंडळींचे छायाचित्र टांगलेली दिसतील) तसच काहीस चित्र आमच्या महाविद्यालयाच्या कार्यालयाच (त्यात सावित्रीबाई याचं हि छायचित्र). आमच्या कामाला थोडा उशीर होणार होता, त्यामुळे तिथे थांबण भाग होत. मग टंगळ मंगळ करत ते कार्यालय निरखत होतो. त्यावर ती (माझी वर्गमैत्रीण) सावित्रीबाईच्या छायाचित्राकडे इशारा करत मला विचारते."ह्या कोण ?". सुरवातीला मला वाटल चेष्टा करत असेल. चपापून मी एक दोन प्रश्न विचारल्यावर कळल, तिला  खरच माहिती नव्हती. आता ह्यावर तिला मी काय सांगाव हे खरच कळत नव्हत. थोडक्यातच तिला म्हटलं "ह्यांच्या मुळे आज आपण इथे आहोत." वर्गमैत्रीण असल्यामुळे फारस झापल नाही (नाहीतर पूर्ण इतिहासाचा तास घेण्याची माझी तयारी होती.) वाटल नक्कीच तिला इतिहास नीट शिकवलं नसेल किंवा तिला इतिहासात रस नसेल.

दुसर कारण म्हणजे हल्लीचच अगदी ताज उदाहरण आहे. आमच्या परिसरातील एका शाळेत चक्क आठवड्यानंतर म्हणजे १० जानेवारीला सावित्रीबाईची जयंती साजरी केली. कारण काय तर ३ जानेवारीला ते विसरले. असे कसे काय विसरू शकतात हे लोक? शाळेतल्या शिक्षकांना जर सावित्रीबाई कोण, कुठल्या हे माहिती नसेल किंवा ह्याचा विसर पडला असेल, तर येणाऱ्या पिढीला विसर पडण साहजिकच आहे. (उशिरा का होईना त्यांना आठवण झाली म्हणून त्यांचे आभार)

आजच्या मुलींचे (Role model) आदर्श म्हणजे आजच्या सिने नट्या. जमानाच तसा आहे, जे दिसत तेच विकत. पण थोडा विचार केलात कि जाणवेल इतिहासात त्या वेळेला सावित्रीबाईनी महात्मा ज्योतिबांच्या सांगण्यावरून धाडस केल नसत, तर आजच्या ह्या सिने नट्या तुमच्यासाठी आदर्श ठरल्या असत्या का? किंवा तुम्ही/मी असे छान शिकून आत्मविश्वासने मोठमोठ्या (so called MNC) कार्यालयात किंवा अजून इतर क्षेत्रात  असे नाव कमवू शकलो असतो का? बघा जरा विचार करून आणि उत्तर शोधा. 

खंत वाटते, तुम्हा आम्हा सर्वाना ह्याचा विसर पडत चालला आहे. येणाऱ्या पिढीला ह्या गोष्टीच काही कौतुक उरणार नाही. नेहमीच त्यांची आठवण काढा अस माझ म्हणण नाही. पण छायाचित्र  पाहून विचारू तरी नका हे कोण म्हणून? माझ फक्त एकच म्हणण आहे, सावित्रीबाई आणि त्यांच्या सारखेच इतर अनेक थोर मंडळींचा जरी इतिहास असला, तरी त्यांना इतिहास जमा करू नका.

ता.क. 
सावित्रीबाई बद्दल अजून माहिती मिळवण्यासाठी नमूद केलेली पुस्तक वाचा(वेळ असेल तर). नाहीतर आता काय गुगल महाराज आहेतच.

१. "साध्वी  सावित्रीबाई  फुले" – फुलवंत  झोडगे, चिनार पब्लिकेशन , पुणे 
२. "त्या  होत्या  म्हणून" – डॉ. विजया  वाड, अनुश्री पब्लिकेशन


----
विनया ज. शिर्सेकर.  


1 comment:

  1. इतिहास आणि त्याबद्दल लिहिण्याची कल्पना ह्या दोघांचा चांगल मेल साधला आहे आपण.

    ReplyDelete